औरंगाबाद ला कॉलेजात शिकत असताना अधून मधून अंबाजोगाई ला घरी येन व्हायच. पण बऱ्याचदा महीनोन महीने मी घरी फिरकायचो नाही. कॉलेज, मित्र, निरनीराळया उचापती यातच मशगूल असायचो.
घरी आल्यावर देखील, लहानपनीचे मित्र खूप दिवसांनी भेटायचे म्हणून दिवस रात्र त्यांच्यासोबत मस्ती चलायची.
रोजच रात्रि घरी परतायला खुप उशीर व्हायचा. माझ्यामागे गेट बंद करायला म्हणून पप्पा जागे राहायचे तर मी जेवतो की नाही हे पाहायला आई जागी असायची.
एक रात्रि नेहमीप्रमाणे मी उशिरा घरी आलो.
घरी कदाचित टिंकुची आवडती बटाटयाची भाजी केलेली असावी. त्याने ती पूर्णच संपवली होती.
आई म्हणाली काही करुन देते. मी नको बोललो व घरात काय असेल ते दे अस सांगितल.
दूध होत. दिवसभर तापुन वापरून घट्ट झालेल दूध.
ते थोड़ गरम करुन पातेल्यातच ज्वारिचि भाकरी मी कुसकरून खाल्ली. आई पहात होती, तिला वाईट वाटत होत की मला कदाचित न आवडनार अस काही खाव लागत आहे.
पण ती दूध भाकरी खरच खूप चविष्ट लागली होती. आधी कधी दूध अस आवडल नव्हतच.
मी आई ला सांगितल की आता रोज रात्रि मी हेच खानार, वेगळ काही करायची गरज नाही. तिला आश्चर्य वाटल, कदाचित अविश्वास देखील.
कसोटी दुसऱ्या रात्रि होती.
पण त्या रात्रिपासून मी रोज भाकरी आणि दुधच खाऊ लागलो. लेट यायच, दूध कड़क तापवायच, त्यात उरलेल्या सर्व भाकरी कुस्करायच्या आणि पातेल चाटून पुसून खायच..
आई पहात असायची. तिच्या चेहऱ्यावर समाधान की काहीतरी दिसल्याच् आता आठवत. मंद हसत ती मला जेवताना पाहायची. उरलेल्या शिळया भाकरीच उद्या काय कराव की नेहमीप्रमाणे स्वत: खावि, उरलेल्या दुधाच उद्या काय कराव या गोष्टींची काळजी तिला कदाचित करावी लागत नसेल. आणि त्यातच ती किती खुश व्हायची. खरच आया वेड्या असतात किती..
तीच ते मंद हसु कदाचित मी त्यावेळिच अनुभवायला हव होत.. पण मी माझ्याच विश्वात हरवलेला असेल तेव्हा.. आता सोबतिला फ़क्त जर-तर आणि उसासे.
आज पुण्यातल्या एका रहदारीच्या रस्त्यालगत फुटपाथवर बसून हे सर्व या ब्लॉग वर उतरवताना, ही जाणीव खुप होतेय की.. इतक्या गर्दीत बसून देखील जानवणाऱ्या एकटेपनातही मला एकट न वाटू देण्याच् सामर्थ्य आहे केवळ तिच्यात!
खरच वेड्या असतात आया आपण म्हणजेच सर्वस्व मानतात.
ReplyDeleteखुप छान लिहीलस प्रफुल्ल .